नाथपंथीय साधना आणि साधनेची ओळख

नाथपंथीय साधना आणि साधनेची ओळख

(भाग ०१)

श्री शीलनाथ महाराज
श्री शीलनाथ महाराज

नाथपंथातील योग

नाथपंथ हा एक शुध्द साधना मार्ग असून याच जीवनात त्याचा अनुभव येणे हीच त्याची सार्थकता आहे. “परमात्मा कैवल्यस्वरूप आहे” हा नाथपंथाचा तात्विक सिध्दांत आहे. तो भाव आणि अभावाच्या पलिकडे असून त्याला न भाव (वस्ति) म्हणता येईल, न अभाव (शून्य) म्हणता येईल.

बस्ती न शून्यं शून्यं न बस्ती। अगम अगोचर ऐसा ॥
गगन सिखरमहि बालक बोलहि। बाका नाम धरहुगे कैसा ॥

— गोरख सबद

अश्या या कैवल्य स्वरूपाकडे पोहोचणे हाच जीवाचा मोक्ष आहे. सिध्दांतापेक्षा त्या सिध्दांताच्या अनुभूतीपर्यंत पोहोचविणाऱ्या मार्गालाच साधकाच्या दृष्टिने महत्त्व असते. सैध्दांतिक दृष्टीने आत्मा व परमात्म्याचा संबंध काहीही असो, व्यावहारीक दृष्ट्या त्या दोघांचा संयोग म्हणजेच मोक्ष मानला जाईल. म्हणूनच कैवल्य मोक्षालाही योगच म्हणतात. याच कैवल्य अनुभूतीपर्यंत पोहोचविणारा पंथ म्हणून नाथ पंथाकडे पाहिले जाते. योगाची युक्ती सांगतो तो नाथपंथ !

सप्तधातु का काया पिंजरा । तामाहि ‘जुगति ‘ बिना सूवा ॥
सद्रुरू मिले त ऊबरे । नहि तो परले हुवा ॥

— गोरक्षनाथ

जीवाच्या पराधीनतेचे मुख्य कारण असलेल्या शरीराकडे सर्वप्रथम लक्ष जाते. माणसाची परवशता प्रकट करणारी शरीराची नश्वरताच आहे. म्हणून शरीर विचारापासून योगाचा आरंभ होणे स्वाभाविक आहे.

आरम्भ जोगी कथीला एक सार ।
क्षण क्षण जोगी करे शरीर विचार ॥

बर्‍याचश्या अध्यात्म मार्गामध्ये शरीराकडे दुर्लक्ष केले जाते. त्याला शत्रुवत कष्ट दिले जातात. परंतू शरीर हे आमचे शत्रू नसून आत्म्याने आपल्या अभिव्यक्तिसाठी ते धारण केलेले असते. म्हणून आपल्या मूळ उद्देशाला विसरून आपण साधनालाच साध्य समजण्याची चूक करीत असतो. आणि आपला अमूल्य वेळ निद्रालस्यामध्ये घालवित असतो.

यह तन सांच सांच का घरवा ।
रूधिर पलट अमीरस भरवा ॥

— गोरक्षनाथ

म्हणूनच शरीराचा सदूपयोग करायला पाहिजे. जे केवळ त्याचे इंद्रियजन्य लाड पुरवितात ते आणि जे त्याला केवळ ताडनच करतात ते दोघेही शरीरावर अन्यायच करतात. त्याचा यथार्थ उपयोग जाणत व करीत नाहीत.

कंदर्प रूप कायाका मंडन । अविर्था काइ उलींचौ ।
गोरख कहे सुणी रे भोंदू । अरंड अभीतक सींचौ ॥

आत्मारूपी राजाचा हा शरीररूपी गड त्याच्या दुरूपयोगामुळे शत्रूरुपी काळाच्या हाती पडतो. म्हणून शरीररूपी हा गड काळरूप शत्रूच्या हातून सोडवून त्याचा जो स्वामी आत्मा त्याच्या स्वाधीन केल्यास त्याचा सदुपयोग होईल. काळाचा प्रभाव शरीरावर जरा आणि मृत्यूच्या रूपाने होतो. जरा, रोग, मृत्यूरहित होऊन काया सदैव बालस्वरुपच होईल तेव्हा ती काळाच्या जोखडातून मुक्त होईल. नाथपंथी योगी अशाच बालस्वरूप कायेच्या प्राप्तीकरीता सदैव प्रयत्नशील असतात. त्याच दृष्ठिने नाथपंथी साधक रसयोगातल्या रस,पारा इ. गोष्टींचा स्विकार करतात. त्यांना माहित होते की, मानवी शरीरातील ज्या रासायनिक परिवर्तनांमुळे जरा-रोग होतात त्यांचा प्रतिकार व प्रतिबंध रसायनांनी करता येतो. अर्थात हे पूर्ण सत्य नाही. रसायनांचा प्रभाव चिरकाल टिकत नाही. आणि म्हणूनच नाथ योग्यांनी रसायन चिकित्सेला सिध्दिमार्गात अनुपयुक्त आणि असमर्थ म्हटले आहे.

सोनै, रुपै सीझे काज । तो तक राजा छांडे राज ॥
जडीबूटी भूलै मत कोई । पहिली रांड बैद की होई ॥
जडीबूटी अमर जै करैं । तो वेद धनंतर काहे मरैं ॥

— गोरक्षनाथ

सदासर्वकाळ भलेही नसे, परंतू रसायनांनी काही काळाकरीता शरीर रोग व वार्धक्यापासून दूर ठेवता येते हा रसायनांचा गुण नाथपंथीयांनी लक्षात ठेवला होता. म्हणून यम नियमादि प्रारंभिक साधनांसोबतच कायाकल्पासारख्या विधीही योगाभ्यासात सांगितल्या आहेत.

अवधूत आहार तोडौ निद्रा मोडौ। कब हूं न होईबो रोगी ॥
छटे छे मासै काया पलटिवा । नाग पन्नग वनस्पति जोगी ॥

हेच कार्य नेति, धौति, बस्ति, नौलि इ.षट्क्रियांनीसुध्दा होते. कायाशुद्धीचे लक्षण असे सांगितले आहे की,

बडे बडे कुलहे मोटे मोटे पेट । नही रे पूता गुरू से भेट ॥
खड खड काया निरमल नेत। भरे पूता गुरू से भेट ॥

काळावर विजय मिळविण्याच्या इर्षेने फार प्राचीन काळापासून योगाभ्यासी पुरूष मानवी शरीरासंबंधी विचार करीत आहेत. त्यातूनच एका अती सूक्ष्म व विलक्षण अशा शरीर विज्ञानाचा उगम झाला. त्यामुळेच आपल्याला समजले की, मानवी शरीरात नऊ नाड्या, बहात्तर कोष, चौसष्ठ संधी, षटचक्र, षोडशाधार, दशवायू, कुंडलिनी इ. विराजमान आहेत.
सहस्त्रार चक्रातल्या गगन मंडलात एक भरलेला अमृतकुंभ उपडा ठेवलेला असून त्यातून निरंतर अमृत झरत असते. या अमृताचे पान करणारा योगी शरीर आणि निसर्गाच्या अनेक बाह्य तत्त्वांवर विजय मिळवू शकतो. मात्र सामान्य माणसाला याच अमृतपानाची युक्ति माहित नसल्यामुळे त्याचे हे अमृत मूलाधारस्थित सूर्यतत्त्वाकडून शोषून घेतले जाते.

गगनमंडल में औंधा कुंवा। तहाँ अमृत का बासा ॥
सगुरा होई सो भर भर पीया। निगुरा जाय पियासा ॥

— गोरक्षनाथ

या अमृततत्त्वाचा आस्वाद मिळण्यासाटी योग्यांच्या अनेक युक्तिंचा रहस्यभेद येथे केला आहे. पुरूष शरीरस्थित रेतही याच सूक्ष्म तत्त्वाचे व्यक्त रूप आहे. ब्रह्मचर्यावस्थेत बिंदू रक्षणाला इतके महत्त्व आहे की, बिंदूरक्षण म्हणजेच ब्रह्मचर्य अशी व्याख्या झाली. बिंदूनाशामुळे शरीरावर काळाचा प्रभाव लवकर पडतो व जरावस्था येते. म्हणूनच शरीराच्या दृढतेकरता बिंदू रक्षण फार महत्त्वाचे आहे.

बुन्दहि जोग बुन्दहि भोग। बुन्दहि हरे जे चौसटी रोग ॥
या बुन्दका जो जाणे मेव। सो आपै करता आपै देव ॥

स्त्री राज्यात रममाण झालेल्या आपल्या गुरू श्री मच्छिंद्रनाथांना उद्देशून गोरक्षनाथांनी म्हटले की,….

गुरूजी ऐसा कर्मन कि जै । ताथे अमी महारस छीजे ॥
नदी तीरे बिरखा, नारी संगे पुरूखा । अल्प जीवन की आसा ॥
मन थै उपजे काम, ताथै कंद विनासा। अमी महारस वाघिणि सोख्या ॥
आणि म्हणूनच बिंदू पातामुळे योगी अत्यंत दु:खी होतात.
राज गये कु राजा रोवै। वैद गये कु रोगी ॥
गये कंतकु रोवै कामिनी। बुंद गये कु जोगी ॥

ज्या एका बिंदू पातासाठी / पतनासाठी संसारी जगातले नर आणि नारी जीवाला ओढ लावून घेतात, त्याच बिंदूपातावर नियंत्रण ठेवून योगी लोक आपली सिध्दि साधतात.

एक बुंद नरनारी रीधा। ताही में सिध साधिक सीधा ॥

थोडक्यात, ज्याला बिंदू रक्षण करता येत नाही, त्याला आत्मदर्शन करता येत नाही, त्याचे आत्मपतन होते.

ज्ञान का छोटा, काछका लोहडा ।
इंद्रि का लडबडा जिव्हा का फूहडा।
गोरख कहे ते पारतिख चूहडा ॥

म्हणूनच योग्याला शरीर आणि मनाच्या चंचलतेला आवर घालण्यासाठी खाली उतरणाऱ्या (अधोगामी) रेताला निश्वयपूर्वक वर (उर्ध्वगामी) चढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. योग्याने उर्ध्वरेता असावे. त्याची परीक्षा फार अवघड असते.

भगि मुखि बिंदू ।
अग्नि मुखि पारा ।
जो राखे सो गुरू हमारा ॥

सहस्त्रारास्थित अमृताचा आस्वाद घेण्याच्या अनेक युक्त्यांचा योग मार्गात उल्लेख आलेला आहे. उदा. विपरीत करणी मुद्रा, जालंदर बंध, टाळु मूळाकडे जीभ उलटी वळविणे, कुंडलिनी जागरण हे सर्व याचसाठी केले जाते. प्राणायाम सुध्दा याचसाठी केला जातो.

वायू बंध्या सकल जग। वायू किनहुँ न बंध।
वायू बिहूणा ढहि पडे। जोरे कोइ न संध ॥

श्वसन क्रियेशिवाय जर आपण जीवित राहू शकलो तरच आपण कालविजयी होऊ शकतो. म्हणूनच प्राण विजयाचं उद्दिष्ट ठेऊनच योगीजन प्राणायाम करत असतात. केवळ कुंभकातच श्वसन क्रिया एकदम थांबवता येते. त्यात पुरक आणि रेचकाची गरज नसते. ह्यामध्ये प्राण सुषुम्नेत सामावला जाऊन सूर्य व चंद्र नाडींचा संयोग होऊ शकतो. प्राणायामामुळे केवळ प्राणवायूच नव्हे तर सर्व दहाही वायु साधकाला वशा होऊ शाकतात. मात्र त्यासाठी शरीरातील सर्व वायुमार्ग बंद केले पाहिजेत. शरीराच्या रोमरोमात शेवट होणाऱ्या सर्व नाडीमुखांद्वारे वायुचे आवागमन चालू असते म्हणून काही योग पंथांमध्ये भस्मधारण आवश्यक असते. मात्र वायुच्या येण्याजाण्याचे नऊ मार्ग शरीरात असतात. या सर्व नऊ मार्गांना बंद केल्यानेच वायुभक्षण होऊ शकते असे नाथपंथी मानतात.

अवधूत नव घाटी रोकिले बाट। वायू वइनजे चौसटि हाट ॥
काया पलटे अविचल विध । छाया विवरजित निपजे सिध ॥
सास उसास वायुको मछिबा । रोकि लेऊ नव द्वार ॥
छटै छमासे काया पलटिया । तब उनमनि जोग अपार ॥

अश्या प्रकारे जेव्हा वायु शरीरात शांत होतो तेव्हा बिंदु स्थिर होऊन अमृतपान सुलभ होते आणि अनाहत नाद ऐकायला येऊ लागतो. पुढे क्रमाक्रमाने स्वयंप्रकाश आणि आत्मज्योतिचे दर्शन होऊ लागते.

अवधूत सहस्त्रनाडी पवन चलेगा । कोटि झमका नाद ॥
बहत्तर चंदा बाई संख्या । किरण प्रगटी जब आद ॥

योगसाधना म्हणजे केवळ शारीरिक साधन नसते.बहिर्मुख राहून योगसिध्दि प्राप्त होत नाही.त्यासाठी अंतर्मुख होणे नितांत गरजेचे आहे.म्हणून मन:शुद्धि आणि मन:समाधिला योगात फार महत्त्व आहे.या शुद्धि आणि समाधि प्राप्तीकरीता ठारीरशोधन आवरयक आहे.केवळ ठारीराला वा करून भागत नाही तर मनाला वश करणे फार महत्त्वाचे आहे.मनाच्या चंचलतेमुळे शरीरही चंचल होते आणि इंद्रियांना विषयांची ओढ लागते.म्हणून इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवण्यासाटी मनाला बाह्य पसार्‍यापासून आवरून आत्मतत्त्वाकडे वळविणे गरजेचे आहे.

गोरख बोले सुणहुरे अवधु । पंचौं पसर निवारी ॥
अपणी आत्मा आप बिचारो । सोवो पांव पसारी ॥

आत्मचिंतनाला सर्वाधिक सहाय्य करतो “अजपाजप”! श्वासोच्छ्वासाच्या क्रियेवर मन एकाग्र केल्याने फार उत्तम प्रकारे मनाचा निग्रह होतो. नाथयोग्यांची अशी धारणा आहे की, दिवसरात्र मिळून २१६०० श्वास होतात. यातत्या प्रत्येक श्वासावर “सोऽहं, हंसः” ही अद्वैत भावना करणे यालाच “अजपाजप” असे म्हणतात. यामागचा उद्देश असा आहे की – ब्रह्मभावनेशिवाय एकही क्षण वाया जावू नये. यासंबंधात कबीरजी म्हणतात, –

कबिरा माला काट की । बहुत यतन का फेर ॥
माला फेरो स्वांस की । जामे गांटि न मेर ॥
स्वांस सुफल को जानिये । हरि सुमरन मे जाय ॥
और स्वांस योंही गयो । तीन लोक का मोल ॥

योग्य व पुरेश्या अभ्यासानंतर गुप्तपणे व विनासायासच मनोमन अज्ञी भावना व्हायला लागते. इतकी की पुढेपुढे तर ब्रह्मभावनाच त्याची चेतना बनून जाते.

ऐसा जप जपो मन लाई । सोऽहं सोऽहं अजपा गाई ॥
आसन दृढ करि धरो धियान । अहनिसी सिमिरो ब्रह्मगियान ॥
नासा अग्र बीज जो बाई । इडा पिंगला मधि समाई ॥
छे सै संहस इकीसो जाप । अनहद उपजे आपो आप ॥
बंक नालि में ऊगे सूर । रोम रोम धुनि बाजै तूर ॥
उलटे कमल सहसदल वास । भ्रमर गुफा में ज्योति प्रकाश ॥

कबीर साहेब म्हणतात,-

सहजेही धुनि लगि रही । कहे कबीर घट मांहि ॥
हृदये हरि हरि होत है । मुख की हाजत नाहि ॥
रग रग बोले रामजी । रोम रोम रंकार ॥
सहजे ही धुनि होत है । सोही सुमिरन सार ॥
माला जपुं न कर जपु । मुख से कहूं न राम ॥
मन मेरा सुमिरन करे । कर पाया विसराम ॥

आणि असं म्हटलं गेलं आहे की,

घटहि रहिबा मन न जाई दूर । अहनिसी पीवै जोगी वारूणी सूर ॥

अश्या प्रकारे जेव्हा मनाची बहिर्मुख वृत्ती नष्ट होऊन साधक आत्ममग्न होतो तेव्हा तो मनाच्या पातळीहून उंच वर पोचतो. त्याला उन्मनी दशा प्राप्त होते आणि योगसाधनेद्वारा त्याला अनेकानेक सिध्यि प्राप्त होतात. तो इच्छारूप धारण करू शकतो. त्याला आत्मदेवाचे दर्शनही घडते.

काया गढ भीतर देव देहुरा कासी । सहज सुभाइ मिले अविनाशी ॥
परिचय जोगी उन्मन खेला । अहनिसि ईक्षा करे देवतासु मेला ॥

ही असते केवळ आत्म्याची परमात्म्याशी परिचयाची अवस्था. सर्वात शेवटी निष्पत्ति अवस्था असते ज्यात योग्याला समदृष्टी प्राप्त होते. त्याच्याकरता सर्व भेद नाहिसे होतात आणि सर्व तत्त्वे त्याच्या आज्ञेवर चालतात. ही सर्व भेदरहित अवस्था म्हणजेच अद्वैत अवस्था होय.
“गोरख सबद” नामक ग्रंथात निष्पत्ति प्राप्त म्हणजेच अद्वैतावस्था प्राप्त योग्याचं लक्षण असं सांगितलं आहे,

निषपति जोगी जाणिबा कैसा । अग्रि पाणी लोहा जैसा ॥
बजा परजा समकरि देख । थब जानिबा जोगी निसपति का भेख ॥

कालाचे संपूर्ण त्र्यैलोल्याकर अधिशासन असून तो समग्र प्राणीमात्रांना ललकारतांना म्हणतो की,

उभा मारूं बैठा मारूं । मारुं जागत सूता ॥
तीन लोक मग जाल पसार्‍या । कहा जायगो पूता ॥

काळाच्या या प्रश्‍नावर निष्पत्तिप्राप्त योग्याचे निर्भय उत्तर असते की,

ऊभा खंडो बैठा खंडो । खंडो जागत सूता ॥
तिहूं लोक मे रहूं निरंतर । तौ गोरख अवधूता ॥

योगयुक्तिची प्रामुख्याने दोन अंगे आहेत, पहिले “करणी” आणि दुसरे “राहणी”, वर सांगितलेले सर्व काही “करणी” म्हणजे क्रिया असून ती “राहणी”च्या मार्गानेच शक्य होते. नाथपंथाची राहणी ही मध्यममार्गी म्हटली जाते. जसे इंद्रियांचा दास होऊन राहण्याने साधना करणे शक्य नाही तसेच एकदम भौतिक गरजांकडे पाठ फिरवूनही योगसिद्धि होणे शक्यच नाही. म्हणूनच गोरक्षनाथजींनी उपदेश केला की,

देवकला तो संजम रहिबा । भूतकला आहारं ॥
मन पवन ले उन्मन घटिया । ते जोगी ततसारं ॥

भौतिक आणि आध्यात्मिक गरजांचा सम्यक योग साधून राहाणे हेच नाथयोग्यांच्या “राहणी”चं मुख्य सूत्र आहे. त्याशिवाय योगसिद्धि अशक्य आहे. या सम्यक राहणीअभावीच मग साधकाच्या जीवनात वस्ती आणि जंगल दोन्ही ठिकाणी काही तरी समस्या निर्माण होतात.

अबदु वन खंड जाऊं तो श्रुधा व्यापे । नगरी जाऊ त माया ॥
भरि-भरि खाऊं तो बिंद बियापै । क्यू सीझत डाल व्यंककी काया ॥
म्हणूनच या सर्व समस्या सोडविण्यासाटी उपदेश केला गेला आहे की,
खाये भी मरिये अणखाये भी मरिये । गोरख कहे पूता संजमिही तरिये ॥
धाये न खाईबा, पडे भूखे न मरिबा । हटन करिबा,पडे न रहिबा ॥
यूँ बोल्या गोरखदेव

श्री गुरू महाराजांचेही सांगणे असेच होते की,धाप लागेतो खाऊ पिऊ नये आणि गाढ झोपेच्या आधिन होऊ इतके विश्रांतीसुख घेऊ नये. तसेच व्यर्थ बडबड ठरेल इतके बोलू नये.
कबीरजी म्हणतात की,

अति का भला न बोलना, अति की भली न चूप
अति का भला न बरसना, अति की भली न धूप

योगसाधनेत मनाच्या समतोल स्थितीला फार महत्त्व आहे. या योगेच साधक मध्यममार्गी राहून शरीराच्या किमान गरजाच फक्त पूर्ण करतो आणि मनाला वश करू शकतो. त्यामुळे संयम पालन होते आणि मनाच्या वशीकरणानेच योग साध्य होतो, मनाच्या आहारी जाऊन नाही. मनाचे सामर्थ्य अगाध आहे. जे मन माणसाला चौऱ्यांशीच्या फेर्‍यात टाकते तेच मन माणसाला वश झाले तर त्याच फेऱ्यातून कायमचे बाहेरही काढते.

यहू मन सकती यहू मन सीव, यहू मन पंचतत्वका जीव
यहू मन लै जो उन्मन रहे, तो तीन लोक की बाते कहे

॥ आदेश ॥

 

श्री शीलनाथ महाराजांचे चरित्र आणि त्यांची गुरु-शिष्य परंपरा – येथे पहा.

श्री शीलनाथ महाराजांची आरती – येथे पहा.

 

— लेखन, संकलन, संपादन – सोमनाथशास्त्री विभांडिक, ठाणे.
                                                      संपर्क – ९४२३९ ६४६७३

 

 

आपण आपला अभिप्राय येथे नोंदवू शकता.

error: इतकंच आवडलं असेल तर शेअर करा, कॉपी करणे चांगले नाही.
Scroll to Top

Discover more from श्री ज्ञानोपासना

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Scroll to Top
Enable Notifications OK No Thanks