गीता जयंती – मोक्षदा एकादशी – मोक्षदायिनी एकादशी

GeetaJayanti

श्रीमद भगवद् गीता उपदेश

हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ श्रीमद् भगवद् गीता जयंती म्हणजेच गीता जयंती साजरी केली जाते. संपूर्ण जगातील हा एकमेव ग्रंथ असेल ज्याची जयंती साजरी केली जाते. ब्रह्मपुराणानुसार, द्वापार युगातील मार्गशीर्ष शुक्ल एकादशी या दिवसापासून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश देण्यास सुरवात केली. गीतेची शिकवण म्हणजे ज्ञान मिळवून मोहाचा नाश करणे, मोक्षाचा मार्ग सुकर करणे, आणि म्हणूनच या एकादशीला मोक्षदा एकादशी किंवा मोक्षदयिनी एकादशी असेही म्हणतात.

गीतेत भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धादरम्यान अर्जुनाच्या मनात उद्भवलेला गोंधळ दूर करून जीवनाचे ध्येय आणि ज्ञान सांगण्यासाठी अर्जुनाला उपदेश केला. भगवान कृष्णाचे हे प्रवचन धर्म आणि कर्माचे महत्त्व सांगून गीतेत साठवले गेले. भगवद‌्गीता हा ग्रंथ ज्याकाळी भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर कथन केला, त्याकाळी त्यातील तत्त्वज्ञान जितके उपयुक्त आणि कल्याणकारी होते, तेवढेच लाभदायक प्रत्येक माणसासाठी ते आजही आहे. भले संदर्भ बदलले असतील. परंतु, अखिल मानवजातीच्या कल्याणाचा पाया गीतेत जसाच्या तसा आहे. म्हणून त्याची जयंती साजरी करणे, त्याचे पठण-श्रवण आजही आणि भविष्यातही महत्त्वपूर्ण आणि साजेसे राहील. सदासर्वकाळ गीता एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. ती माणसाला कल्याण मार्गाकडे नेणारी आहे.

खरेतर गीता म्हणजे भगवंताने अखिल मानवजातीला संदेश दिला आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला उपदेश करताना गीता सांगणे ही मोठी घटना असली तरी अर्जुन हा त्या घडीचा केवळ निमित्त आहे. अर्जुनाला तर कुरुक्षेत्रावर फक्त कर्मयोग सांगण्याची गरज होती. परंतु, भगवंताने त्यासोबतच इतरही योग सांगून त्याचे उदात्तीकरण करण्याचे आणि ते विस्ताराने सांगण्याचे कारणच मुळात समस्त ज्ञान मानवापर्यंत ते पोहोचवणे हे आहे.

मूळ संस्कृत भाषेत असलेली हीच भगवद् गीता पुढे संत ज्ञानेश्वर माऊलींनी  ‘ज्ञानेशवरी’ म्हणून प्राकृत भाषेत आणली.

गीता फक्त तत्त्वज्ञान सांगत असली तरी त्यात कर्मयोग (प्रॅक्टिकल) अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा कर्मयोग माणसाला विज्ञानाचे माहात्म्य सांगतो. एकीकडे विधात्यावर श्रद्धा ठेवण्याचे आवाहन गीतेत आहे, तर दुसरीकडे विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अंगीकार करायला शिकवला जातो, असे सुरेख संतुलन सांगणारे तत्त्वज्ञान गीतेत दिसते.

श्रीमद् भगवत गीतेचे १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत, गीतेला उपनिषदांचा दर्जा आहे, म्हणूनच भगवत गीतेला गीतोपनिषद असेही म्हणतात.

भगवद् गीतेतील अध्याय –

अध्याय १ – अर्जुनविषादयोग

  • अध्याय २ – सांख्ययोग(गीतेचे सार)
  • अध्याय ३ – कर्मयोग
  • अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान)
  • अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग
  • अध्याय ६ – ध्यानयोग
  • अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग
  • अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग
  • अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान)
  • अध्याय १० – विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य)
  • अध्याय ११ – विश्वरूप दर्शनयोग
  • अध्याय १२ – भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा)
  • अध्याय १३ – क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
  • अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग
  • अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग
  • अध्याय १६ – दैवासुरसंपविभागयोग
  • अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग
  • अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष)

 

अठरा श्लोकी गीता मराठी –

मराठीमध्ये अठरा श्लोकी गीता म्हणून एक अतिशय सुंदर रचना आहे. यात गीतेच्या सर्व १८ अध्यायांचे सार सोप्या मराठीत सांगितले आहे. प्रत्येक अध्यायासाठी एक श्लोक अशी रचना आहे.

गेले कौरव आणि पांडव रणी वर्णी कथा संजय ।
ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने, वाटे तया विस्मय ।
पाहे पार्थ रणी कुलक्षय घडे चित्ती विषादा धरी ।
युद्धापासुनी होऊनी विमुख तै टाकी धनुष्या दुरी ॥१॥

झाला अर्जुन शोकमय बघुनी वेदांत सांगे हरी ।
आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे अोळखी अंतरी ।
घेई बाणधनु करी समर तू कर्तव्य ते आचरी ।
वागे निस्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी जनांच्या परी ॥२॥

अगा कर्माहूनी अधिक बरवे ज्ञान कथिसी ।
तरी कां तू येथे मजकडूनी हिंसा करविसी ।
वदे तै पार्थाते यदुपती करी कर्म नियते ।
फलेच्छा सांडोनी सहज मग नैष्कर्म घडते ॥३॥

हराया भूभारा अमित अवतारासी धरितो ।
विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो ।
नियंता मी ऐसे समजुनी करी कर्म मजसी ।
समर्पी तूं कर्मी मग तिळभरी बद्ध नससी ॥४॥

करी सारी कर्मे सतत निरहंकार असुनी ।
त्यजी प्रेमद्वेषा धरी न ममता जो निशीदिनी ।
जया चिंता नाही पुढील अथवा मागील मनीं ।
खरा तो संन्यासी स्थिरमतीही संकल्प सुटुनी ॥५॥

चित्ताचा सखया निरोध करणे हा योग मानी खरा ।
हा मी हा पर भेद हा मुळी नसे चित्ती कधी ज्या नरा ।
जो सप्रेम सदा भजे मज तसा जो सर्वभूती सम ।
ठेवी मद् गत चित्त त्याहूनी दुजा योगी नसे उत्तम ॥६॥

माझ्या केवळ जाहली प्रकृतिने ही सृष्टी सारी असे ।
पृथ्वीमाजी सुगंध मीच रस मी तोयांत पार्था वसे ।
सर्वांतर्गत मी परी नुमजती की ग्रस्त मायाबळे ।
जे चित्ती मज चिंतीती सतत ते तापत्रया वेगळे ॥७॥

सदाध्याती माते हृदयकमळी जे स्थिरमन ।
तया देहांती मी अमित सुख देतो हरी म्हणे ।
म्हणोनी पार्था तूं निशिदिनीं करी ध्यानभजन ।
मिळोनी मद् रूपी मग चुकविसी जन्ममरण ॥८॥

भक्तीने जल पत्र पुष्प फल की कांही दुजे अर्पिले ।
ते माते प्रिय तेवी जे जर सदा मद् कीर्तनी रंगले ।
पार्था ते नर धन्य ज्या मुखी वसे मन्नाम संकीर्तन ।
विष्णो, कृष्ण, मुकुंद, माधव हरे गोविंद नारायण ॥९॥

कोठे देवासी चिंतू जरी म्हणसी असे ऐक माझ्या विभूती ।
संक्षेपे अर्जुन मी तुज गुज कथितो मी असे सर्वभूती ।
मी धाता विष्णू मी श्री शिव रवी मी निगमी साम मी विश्वरूप ।
माझी सर्वत्र सत्ता जगी असूनी असे दिव्य माझे स्वरूप ॥१०॥

पार्थ विनवी माधवासी विश्वरूप भेटवा ।
म्हणोनिया हरी धरी विकटरूप तेथवा ।
मांडिला अनर्थ थोर पंडुकुमार घाबरे ।
म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे ॥११॥

बरी सगुण भक्ती ती भजन निर्गुणाचे बरे ।
पुसे विजय तै तदा हरी वदे तया आदरे ।
असोत बहु योग ते तरीही भक्तियोगाहुनी ।
नसेची दुसरा असा सुलभ तो श्रमावाचुनी ॥१२॥

क्षेत्रक्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे कृष्ण पार्थासी सांगे ।
ज्ञानी त्याते म्हणावा भजुनी मज कदा जो मदाने न वागे ।
तैसा ज्या भेदबाणे प्रकृती पुरुषीचा सर्वभूती समत्व ।
कर्माची त्यांस बाधा तिळभरही नसे पावला तो प्रभुत्व ॥१३॥

पार्था मी जनिता तशीच जननी माया जगत् संतती ।
जीवा सत्व रज: तम: स्रीगुण हे स्वाभाविक व्यापिती ।
जो सेवी परि भक्तिने मज तया हे बाधती ना गुण ।
झाला मत् सम तो प्रियाप्रिय नसे त्याते नुरे मीपण ॥१४॥

ऊर्ध्वी मूळ तरी अपार पसरे अश्वस्थ संसार हा ।
छेदाया दृढ शस्त्र एकची तया नि:संगता भूरु हा ।
ऐसे अोळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता ।
ते होती कृतकृत्य गुह्य कळुनी पावोनी सर्वज्ञता ॥१५॥

दैवी प्रकृती लक्षणे मनी धरी धैर्य क्षमा प्रोढता ।
चित:स्थास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादि बा भारता ।
आता दंभ असत्य मत्सरपणा वर्मी परा बोलणे ।
काम क्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षणे ॥१६॥

सत्व रज: तम तीन गुणापरी श्रद्धा तप मख दान असे ।
त्रिविध अन्न ही निज बीजापरी आवडी त्यावरी दृढ बैसे ।
उत्तम मध्यम अधम जाणही क्रमे तयातुनी सत्व धरी ।
मग अोम तस्तत् वदूनी धनंजय ब्रम्हसमर्पण कर्म करी ॥१७॥

त्यजू पाहसी युद्ध परि ते प्रकृती करविल तुजकडूनी ।
तरी वद पार्था परिसूनी गीता रूचते ममता का अजूनी ।
मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी ।
कृतार्थ झालो प्रसाद हा तव वचन तुझे मज मान्य हरी ॥१८॥

॥श्री कृष्णार्पणमस्तु॥

 

श्रीमद् भगवद् गीता आरती मराठी
जय भगवद् गीते, जय भगवद् गीते ।
हरि-हिय-कमल-विहारिणि सुन्दर सुपुनीते ॥

कर्म-सुमर्म-प्रकाशिनि कामासक्तिहरा ।
तत्त्वज्ञान-विकाशिनि विद्या ब्रह्म परा ॥ जय ॥

निश्चल-भक्ति-विधायिनि निर्मल मलहारी ।
शरण-सहस्य-प्रदायिनि सब विधि सुखकारी ॥ जय ॥

राग-द्वेष-विदारिणि कारिणि मोद सदा ।
भव-भय-हारिणि तारिणि परमानन्दप्रदा ॥ जय॥

आसुर-भाव-विनाशिनि नाशिनि तम रजनी ।
दैवी सद् गुणदायिनि हरि-रसिका सजनी ॥ जय ॥

समता, त्याग सिखावनि, हरि-मुख की बानी ।
सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी ॥ जय ॥

दया-सुधा बरसावनि, मातु ! कृपा कीजै ।
हरिपद-प्रेम दान कर अपनो कर लीजै ॥ जय ॥

।।श्री कृष्णार्पणमस्तु।।

 

6 thoughts on “गीता जयंती – मोक्षदा एकादशी – मोक्षदायिनी एकादशी”

  1. केवळ दैवी प्रेरणेनेच असा लेखन आविष्कार घडू शकतो.अतीशयच सुंदर लिखाण आहे.याच अंत: प्रेरणेने हे कार्य पुढेही चालू ठेवले तर अधिकाधिक सकस आणि प्रसादतुल्य साहित्य निर्मिती होईल. *||जय श्रीकृष्ण||*
    सोमनाथ शास्त्री, ठाणे.

  2. सौ. उषा दुसाने

    अतिशय उत्तम, उत्कृष्ट, सोप्या पद्धतीने मराठी भाषेत संक्षिप्त अठरा अध्यायांचे सार अठरा ओवीत काव्यमय स्वरूपात विशिष्ट रचना, थोड्याच , मोजक्या शब्दात , थोड्याच वेळात वाचून मनाला ओढ वाटावी, व आनंद , प्रसन्न मनाने उत्सुकतेने , उत्साही पणे वाचक वाचून गीतामृतांचा प्रसाद प्राशन करीत आहोत जणू असे मनापासून मनाला खूप शांती, समाधान वाटणारी गीतामृत मराठीत अनुवाद करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री खूपच आभार अप्रतिम मराठी अठरा अध्यायांचे सार सोप्या काव्यमय करून वाचक अल्पावधीतच गीतामृत वाचून तृप्त व धन्य, आनंदी होतो . खरंच खूप खूप धन्यवाद.

  3. आजच्या मार्गशीर्ष शुक्ल एकादशी योगावर श्रीकृष्ण कृपेने हे ज्ञान तुमच्या मार्फत आम्हा जन सामान्यांना प्राप्त झाले. सुलभ, संक्षिप्त आणि ज्ञानदायी गीताजी तुम्ही सांगितली, त्यास भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांची प्रेरणा नक्कीच आहे. जय श्री कृष्ण जय श्री राधे…हरी बोल…🙏🕉️🚩🕉️🙏
    आर्य सनातन हिंदु धर्म की जय हो…
    🚩🔱 “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व” 🔱🚩

Leave a Reply to Sagar BarveCancel reply

error: इतकंच आवडलं असेल तर शेअर करा, कॉपी करणे चांगले नाही.
Scroll to Top

Discover more from श्री ज्ञानोपासना

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Scroll to Top
Enable Notifications OK No Thanks